अमळनेर
लोकमन न्यूज..अनिल चौधरीनिंब, अमळनेर..आपण एकमेकांना दोष देतो आहोत.
पटसंख्या वाढली म्हणून?
साधनसामग्री अपुरी म्हणून?
शिक्षक अपुरे म्हणून?
की शासन धोरणांमुळे?मात्र खरे उत्तर शोधताना चर्चा वेगळ्याच दिशेने भरकटते आहे.
लोकमन न्यूजने लोकांच्या मनाचा कानोसा घेतला, तेव्हा एक अस्वस्थ करणारे वास्तव समोर आले. आज शिक्षणव्यवस्थेतील प्रश्नांइतकाच मोठा प्रश्न घराघरात आकार घेतो आहे—तो म्हणजे अति महत्त्वाकांक्षेचा.
“माझा मुलगा आजच्या आज डॉक्टर झाला पाहिजे, इंजिनिअर झाला पाहिजे.”
“अडीच-तीन वर्षांत इंग्रजी बोललीच पाहिजे.”
हा अट्टहास फक्त शब्दांपुरता राहत नाही, तर तो थेट कोवळ्या बालमनावर लादला जातो. आणि तिथूनच सुरू होतो एका निरागस बालकाचा जीवघेणा प्रवास.
मानसशास्त्र सांगते की बालक पाच ते सहा वर्षांचे होईपर्यंत आईच्या सानिध्यात, सुरक्षित भावनिक वातावरणात वाढले पाहिजे. खेळ, संवाद, माया आणि अनुभव—हेच त्या वयातील खरे शिक्षण.
पण वास्तव वेगळेच आहे.
आज पाळणाघर, नर्सरी, प्री-नर्सरी, स्पोकन क्लासेस या शर्यतीत बालपण हरवत चालले आहे. घरातील वडीलधारी मंडळी जेव्हा यावर चर्चा करतात, तेव्हा चित्र निराळे असते—संयम, समतोल आणि समजूतदारपणा दिसतो.
मात्र ‘आधुनिक मम्मी’ घराघरात कुणाचे ऐकायला तयार नाहीत.
“फलाण्याचा मुलगा शाळेत गेला, मग माझाच का नाही?”
एकीने मुलाला पाठवले, की दुसरीला हौस चढते—आणि बालकाचा विचार कुठेतरी मागे पडतो.
शिक्षणाचा हेतू यशस्वी माणूस घडवण्याचा असतो, ताणतणावग्रस्त रोबोट तयार करण्याचा नाही.
आज प्रश्न शिक्षकांचा कमी आणि अपेक्षांचा अधिक आहे.
प्रश्न धोरणांचा कमी आणि पालकांच्या अधीरतेचा अधिक आहे.
म्हणून दोष देण्याआधी आत्मपरीक्षणाची गरज आहे.
कारण शिक्षणव्यवस्था बदलायची असेल, तर सुरुवात घरापासूनच करावी लागेल.
क्रमशः… 

दोष कुणाचा? शिक्षणव्यवस्थेपासून ‘आधुनिक मम्मी’पर्यंतची चक्रव्यूह
Anil Chaudhari १०/२/२०२६

जाहिरात


अनिल चौधरी (Anil Chaudhari)
संपादक / Editor-in-Chief
लोकमन न्यूजचे संस्थापक आणि मुख्य संपादक. सत्य आणि निःपक्ष पत्रकारितेचा वसा घेऊन समाजमनावरील प्रश्न मांडण्याचे कार्य अविरत सुरू आहे.
