महाराष्ट्र
लोकमन न्यूज | प्रतिनिधी : अनिल चौधरी | निंब, अमळनेर
नाशिक आणि धुळे जिल्ह्यात अल्पवयीन मुलांच्या बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत असून, यामुळे पालकांमध्ये भीती व दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नाशिक येथे अवघ्या ११ दिवसांत तब्बल ९५ मुले बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर जवळच्या धुळे जिल्ह्यातील देवपूर व इतर भागांतून केवळ ३ दिवसांत ४ मुले बेपत्ता झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
लोकमन न्यूज प्रतिनिधींनी मिळवलेल्या माहितीनुसार, नाशिक शहरातील पंचवटी, सातपूर, सिडको, आडगाव आदी परिसरातून मोठ्या प्रमाणावर मुले बेपत्ता झाल्याची नोंद आहे. २० जानेवारी ते २० फेब्रुवारी या कालावधीत सुरू असलेल्या ‘ऑपरेशन मुस्कान’ दरम्यानही बेपत्ता मुलांचा आकडा वाढत असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
धुळे जिल्ह्यातील देवपूरसह इतर भागांतून अल्पावधीत चार मुले बेपत्ता झाल्यामुळे ग्रामीण व शहरी भागातील पालकांमध्ये आपल्या मुलांच्या सुरक्षेबाबत तीव्र अस्वस्थता आहे. शाळा, खेळण्यासाठी बाहेर जाणे किंवा दैनंदिन कामांसाठी घराबाहेर पडणाऱ्या मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
विशेषतः –
बिना नंबर प्लेटच्या मोटरसायकल्सवर लक्ष ठेवावे,
बिना आधार कार्ड अथवा ओळखपत्र असलेले किरकोळ विक्रेते, फेरीवाले किंवा नव्याने गावात प्रवेश करणाऱ्या संशयित व्यक्तींची माहिती घ्यावी,
ग्रामपंचायत, पोलीस पाटील व स्थानिक नागरिकांनी समन्वयाने लक्ष ठेवावे,
असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
नागरिकांनी कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असेही पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. वाढत्या बेपत्ता मुलांच्या घटनांमुळे संपूर्ण परिसरात सतर्कतेचे वातावरण निर्माण झाले असून, लवकरात लवकर ठोस कारवाईची मागणी होत आहे.


‘ऑपरेशन मुस्कान’ दरम्यानही धक्कादायक वास्तव; नाशिक-धुळे हादरले
लोकमन न्यूज..अनिल चौधरी १२/२/२०२६

जाहिरात


अनिल चौधरी (Anil Chaudhari)
संपादक / Editor-in-Chief
लोकमन न्यूजचे संस्थापक आणि मुख्य संपादक. सत्य आणि निःपक्ष पत्रकारितेचा वसा घेऊन समाजमनावरील प्रश्न मांडण्याचे कार्य अविरत सुरू आहे.
